Wednesday, August 18, 2010

पर्यावरण-वादी

एकदा एक निसर्गवादी पर्यावरण-तज्ञ एका चायनीज हॉटेल मध्ये गेली. जेवणाच्या आधी एक वृद्ध वेटर बांबूच्या चॉप स्टिक्स टेबलावर व्यवस्थित मांडून ठेवू लागला. तिने वेटरला त्या बाबूच्या चॉपस्टिक्स परत घेऊन जायला सांगितले. तिला चॉपस्टिकसारख्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूसाठी बाबूची वने नाहीशी होणं रुचत नसे. म्हणून ती तिच्या चॉपस्टिक्स घरूनच घेऊन येई. पण त्या वेटरला हे माहित नसावे कदाचित.. तिने आपल्या पर्स मधून तिच्या चॉपस्टिक्स बाहेर काढल्या. वेटरने चमत्कारिक नजरेने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, "व्वा, फारच छान! हस्तिदंत!!"

यातला विनोद तसा फारच गंभीर आहे..आणि दुर्दैवी सुद्धा! पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या कल्पना ह्या आपल्या जागी योग्यच आहेत; पण या कल्पना, विचार आणि आदर्श हे जे पर्यावरणशास्त्राचे गाढे अभ्यासक असल्याचा दावा करतात, त्यांच्याकडूनच पायदळी तुडवले जातात. पर्यावरणवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांना स्वत:वर इतका विश्वास असतो कि आपण चुका करूच शकत नाही असेच त्यांना वाटते. त्यांची 'कार्ये' अगदी सहजगत्या त्यांच्या नजरेतून सुटतात. एकीकडे लाकूड तोडीचा, वृक्ष-तोडीचा निषेध करायचा आणि घरी मात्र 'वूडन-फ्लोरिंग' व अजस्त्र लाकडी फर्निचर बनवून घ्यायचं याला काहीच अर्थ नाही! पर्यावरणाला आणि संबंधित लोकांना मात्र ते स्वत:चीच मालमत्ता असल्यासारखी वापरतात, त्यांवर आपले विचार थोपवतात. एखादा उपक्रम अयशस्वी झालाच तर त्याच खापर फोडतात ते संसाधनांच्या अवाढव्य मागणी वर..

हल्ली वन्यप्राणी व निसर्ग छायाचित्रणाचे फार खुळ आहे. मोबाईलच्या क्रांतीमुळे तर शेंबड नाक साफ न करता येणारे दिग्गज ही मोबाईलने फोटो काढतांना दिसतात. मग त्या निमित्ताने वन्यप्राणी- अधिवासाच्या निकट जाणे ओघानेच आले. आणि जास्तीत जास्त आगळा व अद्वितीय फोटो काढण्याच्या नादात ते कधी संबंधित वन्यप्राण्याच्या अधिवासाचे नुकसान करतात हे त्यांचे त्यांना देखील उमगत नाही. काही दिवसांपूर्वी मी एका जंगलात भटकंती करायला गेलो होतो. तेव्हा मला एक लहान पक्ष्याचे घरटे दिसले. झाडाची पाने वाकवून तिने आडोसा तयार केला होता आणि त्यात अंडी घातली होती. त्या घरट्याची अवस्था पाहून माझ्या चटकन लक्षात आलं कि एखादा 'निसर्ग-मित्र' येथे येऊन गेला आहे. बाजूची काही पाने जी आडोशाला कारणीभूत ठरत होती ती तुटून पडली होती. जवळच बिस्कीटच्या पुड्याची आवरणं पडली होती. बाजूच्या रस्त्यावरून घरट्याच दर्शन अगदी सहजपणे होत होतं.

देव जाणे तो पक्षी तिथे परत येईल ही कि नाही?! त्या 'निसर्ग-मित्रा' चा घटकाभर विरंगुळा झाला असेल ही; पण त्या इवल्याशा पक्ष्याची महिन्यांची मेहनत वाया गेली. शिवाय घरट मोडल्यामुळे ती आता तिची अंडी उबवायला येणार नाही. पुन्हा अंडी घालायची म्हटली तर पुढच्या विणीच्या हंगामाची वाट पाहावी लागणार हे वेगळच! म्हणजे किती मोठे, तिहेरी नुकसान झाले हे पर्यावरणाचे!! वर नंतर हे असेच 'निसर्ग-मित्र' बोंभाटा करणार कि पक्ष्यांची संख्या घटते आहे.. हेच का आपले निसर्ग-प्रेम? काय अर्थ आहे अशा निसर्ग-प्रेमाला???

स्वत:ला सृष्टी-शास्त्रज्ञ म्हणवणारे, निसर्ग-वादी म्हणवणारेच जेव्हा असं काही करू लागतात तेव्हा वाटत कि सामान्य माणूस अशा 'निसर्ग-मित्रां' पेक्षा कितीतरी पटींनी बरा.. योग्यायोग्य जरी कळत नसलं तरी त्यांना इतक माहित असतं कि चिमणीच्या घरट्याला, अंड्यांना हात लावला तर ती ते घरट सोडून निघून जाते. निदान या समजुतीमुळे तरी सामान्य माणूस पक्ष्यांच्या घरट्याजवळ जात नाही...

पण हे समजण्यास जितके सोपे आहे तितकेच अंगीकारण्यास महाकठीण! निसर्गाला नुसता दिखावा करणाऱ्या सृष्टी-वादी पर्यावरण-तज्ञांची गरज नाहीये. निसर्गाला खरी गरज आहे ती त्यावर निरागस प्रेम करणाऱ्या निसर्ग-प्रेमींची! निसर्गाला आपलं मानणाऱ्यांची!!!

Saturday, July 3, 2010

मानसां, मानसां..कधी होशीलं माणूस?

"तुझा गीतेवर विश्वास आहे का? हिंदूंचा सर्वात पवित्र ग्रंथ!" दिपकचा आवाज आक्रमक झाला होता.
"हो रे बाबा.. आहे!" माझ्या आवाजात सारवा-सारव होती.
"मग हे पहा.. यात स्पष्ट लिहिलेलं आहे कि मनुष्य हा सर्व प्राणीमात्रांत श्रेष्ठ आहे. आणि मला तर वाटत कि तोच सर्वात सुखी ही आहे."
"असं तू कसं काय म्हणू शकतोस?"
"अरे मनुष्य सर्वांत बुद्धिमान आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर पुष्कळ गोष्टींचा शोध लावला आहे.. आपल जीवन सुखकर बनविलेल आहे." इति दिपक.
"बर बाबा तू म्हणशील तसं.." मी वाद तर संपवला. पण माझ्या डोक्यात मात्र विचार सुरूच होते..

माझा मित्र दिपक.. आम्ही एकाच रूम मध्ये राहत असू. दिपक तसा फार अध्यात्मिक.. रोज गीता-वाचन, गायत्री-मंत्र आणि देव-पूजा ठरलेली. आणि मी नेमका विरुद्ध! मी नास्तिक आहे अशातला भाग नाही. पण मूर्ती-पूजेवर माझा विश्वास नाही. देव आहे आणि तो सगळीकडे आहे, सगळ्या सजीवांमध्ये आहे. मग फक्त ज्याला सगळे 'देव' म्हणतात, म्हणून त्याची पूजा करायची आणि इतरांशी आपल्याला वाटेल तसे वागायचे याला काही अर्थ आहे का? मला तरी ते नाही पटत. पण खरच विचार करण्याजोगी गोष्ट आहे नाही?! मनुष्य..सर्वांत सुखी आणि श्रेष्ठ???

का? इतर प्राणी सुखी नसतात का??

पशु, पक्षी, किटके, जलचर, सर्प-वर्गीय आणि वृक्ष-वेली सुद्धा.. सारे, सारेच आपआपल्या विश्वात सुखीच असतील की! बिया जमिनीत रुजतात आणि एखाद्या प्रसन्न सकाळी अंकुरतात. हळूच एक अंकुर जमिनीच्या वर डोकावतो..कालांतराने बहरतो, फुलतो. पठारे, डोंगर, दऱ्या-कपारी इतकच काय तर भिंतींवरही काही झाडे उगवतात आणि जगतात.. शाकाहारी प्राणी हिरवं गवत, पाला, पाने खातात, तर मांसाहारी प्राणी शिकार करतात. पक्षी आकाशात विहार करतात. विविध फळा-फुलांवर ताव मारतात.. मुंग्या, मधमाश्या कश्या एवढ्या सहकार्याने एकत्र काम करतात?! सर्वांची कामे कशी एकदम सुरळीत चालू असतात??!

जर ते सुखी नसते, त्यांच्यात चैतन्यच नसतं, तर ही सगळी कामे होऊ तरी शकली असती का? कशावरून सर्व सजीव त्यांची ही कामे करतांना आनंद उपभोगत नसतील? माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर पुष्कळशा सुख-सोयी निर्माण करून स्वत:चे आयुष्य फारच सुखकारक बनविलेले आहे. पण याचा अर्थ असा होत नाही कि तो सर्वांत सुखी आहे म्हणून! आणि खर पाहता त्याने आपले आयुष्य आरामदायक बनविण्याच्या नादात आणखीनच क्लिष्ट बनविले आहे. तो स्वत:च बनविलेल्या नियम आणि कायद्याच्या जालात गुरफटला आहे. खर पाहता, त्याने नियम आणि कायदे बनविले ते स्वत:साठी, मनुष्य-जाती साठी. पण आज तेच नियम आणि कायदे त्याला माणसापेक्षा जास्त महत्वाचे झाले आहेत. नियम तो नियम.. मग माणुसकी चुलीत का ना जावो..कोणाला नरक-यातना का ना भोगाव्या लागोत! सर्व प्राणिमात्रांत शक्तिमान आहे तो.. तो काहीही करू शकतो. पण मोठ्या सामर्थ्याबरोबर मोठी जबाबदारी ही येते, हे तो साफ विसरला आहे. स्वत:ची प्रगती, विकास करतांना कुठे थांबायला हव हे अजूनही त्याला कळलेलं नाही. आणि आपला विकास साधतांना निसर्गाला, इतर सजीवांना तर धोका नाही ना, हे पहायला त्याला वेळ कुठे आहे? अहो बाकीचे विसरा..पण तो इतर माणसांचे तरी हित पाहतो का? सर्वांशी प्रेमभावाने वागतो का? तर नाही..इथेही लढाया, हल्ले, वर्ण-भेद, द्वेष-तिरस्कार, कुरघोडी करण्याचे प्रयत्न आहेतच की... मग माणूस सर्व-श्रेष्ठ कसा? निसर्गाने जर माणसाला इतर प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धिमान बनविल आहे, तर तो फक्त स्वत:पुरताच विचार कसा करतो?? का आपला थोडा वेळ, आपले सामर्थ्य आणि आपली बुद्धी तो मानवजाती साठी, निसर्गासाठी, पशु-पक्ष्यांच्या कल्याणासाठी खर्च करत??? उलट असे प्रश्न ज्या व्यक्तीला पडतात, त्याला आपणच विचारतो, "बाबा रे, ठीक आहेस ना? तुला काही दूसरा काम-धंदा नाहीये का??"

आज माणसाची ही समजूत, नव्हे असं ठाम मत झाल आहे कि तो आहे म्हणून झाडे आहेत, इतर प्राणी-पक्षी आहेत.. पण वास्तव तर हेच आहे कि ते सगळे आहेत, म्हणून आपण आहोत..!

Saturday, June 5, 2010

"झाडे लावा, झाडे जगवा!"

आज सकाळी भल्या पहाटे मला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. तसा हा रोजचाच नित्यक्रम! आम्ही घरा नजीकच्या बागेत बरीच झाडे लावली होती. मग पक्षी तर येत असतच पण रंगीत फूलपाखरे, सरडे आणि विविध प्रकारचे किडे ही असत. मला या सर्वांना पाहून भरपूर आनंद होई. बालपणापासुनच मला निसर्गाचे वेड! अगदी 'मोठा झाल्यावर मी वनराजीत रहायला जाईन' इतपत!! पक्ष्यांच्या अथवा फूलपाखरांच्या मागे धावायला मला फार आवडे. त्यांच्या सारखं आपल्यालाही स्वच्छंदी उडता आलं तर काय मज्जा येईल असही हळूच वाटुन जाई. असो.

तर विविध पक्ष्यांच्या आवाजाचा कानोसा घेत मी प्रातःविधी आटोपले आणि नेहमी प्रमाणे बागेत आलो. झाडांना पाणी घालणे, तण काढणे आणि बागेत फेरफटका मारणे हा माझा आवडता छंद! झाडांवर पाणी फवारताना माझे काही मित्र सुद्धा उडणाऱ्या तुषारांचा आनंद लुटायचे. हे मित्र म्हणजे शकरखोरे, चश्मेवाला, मैना आणि कोतवाल पक्षी! क्वचित प्रसंगी कोकिळ आणि बुलबुल ही असत. मी त्यांना मित्र संबोधले कारण आमची ही भेट रोजची ठरलेली असायची. त्यात सहसा बदल होत नसे. आजही आम्ही बराच वेळ एकत्र खेळलो. मज्जा आली! ह्या आनंदसोहळ्या चे मला फार अप्रूप वाटे. मनात विचार येई की आपल्या घराभोवतीच नाही तर सगळा गाव आणि परिसर ह्या हिरवाई ने नटला पाहिजे!

पण फक्त विचार करून काहीच होत नाही. म्हणूनच की काय मी स्थानिक निसर्गवादी संस्थेत नाव-नोंदणी करून आलो होतो. ठराविक प्रसंगी आम्ही वृक्षारोपण कार्यक्रम ही आयोजित करत असू. कधीतरी गावातून 'हरित दिंडी' ही काढत असू. "झाडे लावा झाडे वाचवा" या घोषणा ही असतच. एक अलगच आनंद असायचा या कार्यात. या निमित्ताने इतर निसर्गप्रेमी व्यक्तींशी ही ओळख होत असे. आम्हा सर्वांनाच आम्ही करत असलेल्या या सामाजिक कार्याचा फार अभिमान वाटे. सीमेंटच्या वाढत चाललेल्या जंगलात जर आपण पशुपक्ष्यांना त्यांचा अधिवास वापस करू शकलो तर याहून चांगले काम ते कोणते?! नाही का?!

आज ही मी एक नवीन रोपटे लावले. आताशा सूर्य आग ओकत होता. म्हणून मी घरात परतायच ठरवल. तेवढ्यात मला ठक ठक आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पाहतो तर काय एक माणूस रस्त्या लगतच झाड तोडत होता. माझी पायाची आग मस्तकात गेली. अरेच्चा! हा तर शेजारच्या बिल्डिंगचा वॉचमन! बिल्डिंगच बांधकाम चालू असतांना वॉचमन ठेवायची प्रथाच पडली आहे हल्ली. त्यांना एक पत्र्याची खोली बांधून दिली जाते. मग हे लोक वाटेल तसे राहतात. स्वयंपाक व पाणी गरम करावयासाठी सरपण वापरतात. पण मग त्यासाठी चांगली जिवंत झाडांची कत्तल करायची का?? मी कुठे तरी वाचलं होत की जर कोणी वृक्ष-तोड़ करत असेल तर त्याची ही पोलिसांकडे फिर्याद करता येते..

रागाने माझा चेहरा लाल भड़क झाला होता. आम्ही झाडे लावतो ते काय या लोकांसाठी?? असेच स्वार्थी लोकं जबाबदार आहेत जागतिक उष्णता उच्चांकाला! मी लागलीच घरात आलो. माझी पाऊले लाकडी टी-पॉयवर ठेवलेल्या दूरध्वनी संचाच्या दिशेने चालू लागली.. आणि मी जागीच थबकलो. माझं लक्ष आमच्या लाकडी फ़र्नीचरकड़े गेलं. पलंग, दिवाण, खुर्च्या, कपाट असे कितीतरी सामान... हाय रे देवा! या फ़र्नीचर साठी किती झाडांची कत्तल झाली असेल कुणास ठाउक?! माझ्या रागाची जागा आता शरमेने घेतली होती. आपण स्वतःही वृक्ष-तोड़ केलीच आहे की! मग भलेही ते लाकुड आम्ही पैसे देऊन खरेदी केलं असेल पण झाडांचा जीव तर गेलाच ना?! आपण असे लाकडी फर्नीचर विकत घेतो म्हणूनही वृक्ष-तोड होतेच की..!

माझ्या पायातुन तर जसे काही प्राणच निघून गेले होते आणि डोक्यात विचारांचे काहूर माजले होते!

Thursday, June 3, 2010

ती...एक पणती!

पावसाळ्याला अलीकडेच सुरुवात झाली होती. हवेत गारवा होता. आणि ती..एका हिरव्यागार टेकडीसमोर उभी होती. ती टेकडी विविध वृक्षवेलींनी बहरलेली आहे. वड, पिंपळ, पळस, नारळ, शेवगा, चिंच, कडूनिंब अशी पंधरा फूटी झाडे गर्द सावलीस कारणीभूत ठरत आहेत. बऱ्याच पशुपक्ष्यांना आसरा ठरत आहेत. सोबत धायटी, करवंदासारखी विविध झुडूपे देखील आहेतच.

समोरचं दृष्य ती भरल्या डोळ्यांनी पाहत होती. समाधान आणि सार्थकी भाव तिच्या चेहऱ्यावर तरळत होते. साधे कपडे, ओसाड कपाळ, शांत चेहरा, दाट लांबसडक केस, दागिने नावालाही नाहीत..जणू लंकेची पार्वती वाटावी अशी ती. तरीही चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि गूढ हर्ष उठून दिसत होता. फक्त तीन वर्षांपूर्वी जर तुम्ही तिला पाहिलं असतं, तर आज या अवस्थेतल्या तिला पाहून तुम्हाला धक्काच बसला असता! तिचं नाव वसुधा. एक हसरी आणि चुणचुणीत मुलगी. सकारात्मक, स्वतंत्र आणि आधुनिक विचारांची! इतर मुलीं प्रमाणे तिच्याही डोळ्यात बरीचशी स्वप्ने असणं सहाजिकच होतं. मुळातच हुशार असलेल्या वसुधाला MBBS ला प्रवेश सहजगत्या मिळाला. खेळकर स्वभाव असल्याने तिला पूष्कळ मित्र-मैत्रिणी होत्या. अशातच तिची ओळख संजीवन सह झाली. तो तिच्याच बरोबर शिकायचा. लवकरच मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. आई-वडिलांची फसगत दोघांनाही करावयाची नव्हती म्हणून स्वत: काही निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी सर्व हकीकत घरी सांगितली. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून दोन्ही घरांनी लग्नाला परवानगी दिली. वसुधा आणि संजीवनच्या आनंदाला तर पारावार नव्हता. MBBS च शेवटचं वर्ष संपताच लग्न करायचं असं ठरलं. दिवस मजेत जात होते.

सरते शेवटी लग्नाचा दिवस उजाडला..५ मे २००९. मे महीन्याच्या रखरखणाऱ्या उन्हात दोन जीवांची बहरलेली प्रीती आज नवीन आयुष्यात पाऊल ठेवणार होती. मागचे काही आठवडे लग्नाच्या तयारीत निघून गेले. आमंत्रण-पत्रिका वाटप, लग्नाची खरेदी, नातेवाईकांच्या भेटी..बरीच कामे. कितीतरी दिवसांपासून वसुधा या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. आज ती आणि तिचा संजीवन एक होणार होते..कायमचे! तिकडे संजीवनची वाजत-गाजत वरात निघाली होती. मित्र मंडळी बेधुंद नाचत होती. इतक्यात संजीवनला चक्कर आला आणि तो घोडी वरुन खाली पडला. झाले!! सर्व आनंदी चेहरे चिंताक्रांत झाले. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले..

वधुपक्षालाही वर्दी मिळाली. सर्वांचा नूर पालटला. सगळे रुग्णालयाकडे निघाले. डॉक्टरांनी निदान केले..उष्माघात. हाय रे देवा! उष्माघाताने आणखी एक बळी घेतला तर!! वाढत्या उष्णतेबद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण ती कधी आपल्याच मुलाचा बळी घेईल असं संजीवनच्या आईवडिलांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांनी दु:खातिरेकाने हंबरडाच फोडला. वधुपक्षावरही शोककळा पसरली. वसुधा तर सुन्नच झाली. तिचे डोळे एकटक संजीवन कडे पाहत होते. ती रडली तर दुःख हलके होईल म्हणून तिच्या आईने तिला रडवण्याचा बराच प्रयत्न केला पण व्यर्थ! तिच्याकडे पाहून सैतानालाही दयेचा पाझर फुटला असता..पण नियती समोर कुणाचे काय चालले आहे!

असेच काही दिवस गेले. वसुधाच्या आईवडिलांनी तिला धीर देण्याचा बराच प्रयत्न केला. पण स्वत: तेही फार खचले होते. तिच्यासमोर तिचे अख्खे आयुष्य होते, याचीच चिंता त्यांना खात होती. संजीवनच्या आईने तर तिला दुसरे लग्न करण्याचेही सुचवले. पण वसुधाला ते मान्य नव्हते. ती म्हणाली, "आई, आलेल्या संकटावर मात करण्याऐवजी आपण परिस्थितीसोबत जुळवून घेण्यात काय अर्थ आहे? जागतिक हवामान बदलाविषयी आपण सर्वच ऐकतो, पण करत काहीच नाही. मोठी होत जाणारी शहरे आणि सतत लोप पावणारी जंगले हीच वाढत्या उष्णतेसाठी कारणीभूत आहेत. भारताला ३३% वनक्षेत्र अपेक्षित असुनही केवळ २०% च वनक्षेत्र आजमितीला उपलब्द्ध आहे. किंबहुना तेही सतत कमी होत चालले आहे. वनविभागाच्या जमीनीवर एक तर वृक्षतोड चालते अथवा स्वार्थी मनुष्य तिथे घुसखोरी करतो. पण कोणीही या विरळ होत चाललेल्या जंगलांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत नाही."

"अगं पण पोरी, हे तुझं काम म्हणजे रामसेतु बांधण्यासाठी एका खारुताई ने मदत करण्या-सारखेच आहे." इति आई.



"मला ठाऊक आहे ते. पण किती दिवस आपण हातावर हात ठेऊन बसायचं? काहीही असो. माझ्यावर जो प्रसंग गुदरला आहे, तो आणखी कोणावर गुदरू नये यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन. माझ्या सारखी आणखी एखादी वसुधा होऊ नये यासाठी झटत राहीन."

आज तिच्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि तिच्या दृढ़निश्चयते कडे पाहून माझ्या मनात विचार येतोय, "या धरणी मातेला एकाच नाही, तर हजारों वसुधांची गरज आहे..!"