Saturday, June 5, 2010

"झाडे लावा, झाडे जगवा!"

आज सकाळी भल्या पहाटे मला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. तसा हा रोजचाच नित्यक्रम! आम्ही घरा नजीकच्या बागेत बरीच झाडे लावली होती. मग पक्षी तर येत असतच पण रंगीत फूलपाखरे, सरडे आणि विविध प्रकारचे किडे ही असत. मला या सर्वांना पाहून भरपूर आनंद होई. बालपणापासुनच मला निसर्गाचे वेड! अगदी 'मोठा झाल्यावर मी वनराजीत रहायला जाईन' इतपत!! पक्ष्यांच्या अथवा फूलपाखरांच्या मागे धावायला मला फार आवडे. त्यांच्या सारखं आपल्यालाही स्वच्छंदी उडता आलं तर काय मज्जा येईल असही हळूच वाटुन जाई. असो.

तर विविध पक्ष्यांच्या आवाजाचा कानोसा घेत मी प्रातःविधी आटोपले आणि नेहमी प्रमाणे बागेत आलो. झाडांना पाणी घालणे, तण काढणे आणि बागेत फेरफटका मारणे हा माझा आवडता छंद! झाडांवर पाणी फवारताना माझे काही मित्र सुद्धा उडणाऱ्या तुषारांचा आनंद लुटायचे. हे मित्र म्हणजे शकरखोरे, चश्मेवाला, मैना आणि कोतवाल पक्षी! क्वचित प्रसंगी कोकिळ आणि बुलबुल ही असत. मी त्यांना मित्र संबोधले कारण आमची ही भेट रोजची ठरलेली असायची. त्यात सहसा बदल होत नसे. आजही आम्ही बराच वेळ एकत्र खेळलो. मज्जा आली! ह्या आनंदसोहळ्या चे मला फार अप्रूप वाटे. मनात विचार येई की आपल्या घराभोवतीच नाही तर सगळा गाव आणि परिसर ह्या हिरवाई ने नटला पाहिजे!

पण फक्त विचार करून काहीच होत नाही. म्हणूनच की काय मी स्थानिक निसर्गवादी संस्थेत नाव-नोंदणी करून आलो होतो. ठराविक प्रसंगी आम्ही वृक्षारोपण कार्यक्रम ही आयोजित करत असू. कधीतरी गावातून 'हरित दिंडी' ही काढत असू. "झाडे लावा झाडे वाचवा" या घोषणा ही असतच. एक अलगच आनंद असायचा या कार्यात. या निमित्ताने इतर निसर्गप्रेमी व्यक्तींशी ही ओळख होत असे. आम्हा सर्वांनाच आम्ही करत असलेल्या या सामाजिक कार्याचा फार अभिमान वाटे. सीमेंटच्या वाढत चाललेल्या जंगलात जर आपण पशुपक्ष्यांना त्यांचा अधिवास वापस करू शकलो तर याहून चांगले काम ते कोणते?! नाही का?!

आज ही मी एक नवीन रोपटे लावले. आताशा सूर्य आग ओकत होता. म्हणून मी घरात परतायच ठरवल. तेवढ्यात मला ठक ठक आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पाहतो तर काय एक माणूस रस्त्या लगतच झाड तोडत होता. माझी पायाची आग मस्तकात गेली. अरेच्चा! हा तर शेजारच्या बिल्डिंगचा वॉचमन! बिल्डिंगच बांधकाम चालू असतांना वॉचमन ठेवायची प्रथाच पडली आहे हल्ली. त्यांना एक पत्र्याची खोली बांधून दिली जाते. मग हे लोक वाटेल तसे राहतात. स्वयंपाक व पाणी गरम करावयासाठी सरपण वापरतात. पण मग त्यासाठी चांगली जिवंत झाडांची कत्तल करायची का?? मी कुठे तरी वाचलं होत की जर कोणी वृक्ष-तोड़ करत असेल तर त्याची ही पोलिसांकडे फिर्याद करता येते..

रागाने माझा चेहरा लाल भड़क झाला होता. आम्ही झाडे लावतो ते काय या लोकांसाठी?? असेच स्वार्थी लोकं जबाबदार आहेत जागतिक उष्णता उच्चांकाला! मी लागलीच घरात आलो. माझी पाऊले लाकडी टी-पॉयवर ठेवलेल्या दूरध्वनी संचाच्या दिशेने चालू लागली.. आणि मी जागीच थबकलो. माझं लक्ष आमच्या लाकडी फ़र्नीचरकड़े गेलं. पलंग, दिवाण, खुर्च्या, कपाट असे कितीतरी सामान... हाय रे देवा! या फ़र्नीचर साठी किती झाडांची कत्तल झाली असेल कुणास ठाउक?! माझ्या रागाची जागा आता शरमेने घेतली होती. आपण स्वतःही वृक्ष-तोड़ केलीच आहे की! मग भलेही ते लाकुड आम्ही पैसे देऊन खरेदी केलं असेल पण झाडांचा जीव तर गेलाच ना?! आपण असे लाकडी फर्नीचर विकत घेतो म्हणूनही वृक्ष-तोड होतेच की..!

माझ्या पायातुन तर जसे काही प्राणच निघून गेले होते आणि डोक्यात विचारांचे काहूर माजले होते!

No comments:

Post a Comment