Wednesday, August 18, 2010

पर्यावरण-वादी

एकदा एक निसर्गवादी पर्यावरण-तज्ञ एका चायनीज हॉटेल मध्ये गेली. जेवणाच्या आधी एक वृद्ध वेटर बांबूच्या चॉप स्टिक्स टेबलावर व्यवस्थित मांडून ठेवू लागला. तिने वेटरला त्या बाबूच्या चॉपस्टिक्स परत घेऊन जायला सांगितले. तिला चॉपस्टिकसारख्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूसाठी बाबूची वने नाहीशी होणं रुचत नसे. म्हणून ती तिच्या चॉपस्टिक्स घरूनच घेऊन येई. पण त्या वेटरला हे माहित नसावे कदाचित.. तिने आपल्या पर्स मधून तिच्या चॉपस्टिक्स बाहेर काढल्या. वेटरने चमत्कारिक नजरेने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, "व्वा, फारच छान! हस्तिदंत!!"

यातला विनोद तसा फारच गंभीर आहे..आणि दुर्दैवी सुद्धा! पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या कल्पना ह्या आपल्या जागी योग्यच आहेत; पण या कल्पना, विचार आणि आदर्श हे जे पर्यावरणशास्त्राचे गाढे अभ्यासक असल्याचा दावा करतात, त्यांच्याकडूनच पायदळी तुडवले जातात. पर्यावरणवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांना स्वत:वर इतका विश्वास असतो कि आपण चुका करूच शकत नाही असेच त्यांना वाटते. त्यांची 'कार्ये' अगदी सहजगत्या त्यांच्या नजरेतून सुटतात. एकीकडे लाकूड तोडीचा, वृक्ष-तोडीचा निषेध करायचा आणि घरी मात्र 'वूडन-फ्लोरिंग' व अजस्त्र लाकडी फर्निचर बनवून घ्यायचं याला काहीच अर्थ नाही! पर्यावरणाला आणि संबंधित लोकांना मात्र ते स्वत:चीच मालमत्ता असल्यासारखी वापरतात, त्यांवर आपले विचार थोपवतात. एखादा उपक्रम अयशस्वी झालाच तर त्याच खापर फोडतात ते संसाधनांच्या अवाढव्य मागणी वर..

हल्ली वन्यप्राणी व निसर्ग छायाचित्रणाचे फार खुळ आहे. मोबाईलच्या क्रांतीमुळे तर शेंबड नाक साफ न करता येणारे दिग्गज ही मोबाईलने फोटो काढतांना दिसतात. मग त्या निमित्ताने वन्यप्राणी- अधिवासाच्या निकट जाणे ओघानेच आले. आणि जास्तीत जास्त आगळा व अद्वितीय फोटो काढण्याच्या नादात ते कधी संबंधित वन्यप्राण्याच्या अधिवासाचे नुकसान करतात हे त्यांचे त्यांना देखील उमगत नाही. काही दिवसांपूर्वी मी एका जंगलात भटकंती करायला गेलो होतो. तेव्हा मला एक लहान पक्ष्याचे घरटे दिसले. झाडाची पाने वाकवून तिने आडोसा तयार केला होता आणि त्यात अंडी घातली होती. त्या घरट्याची अवस्था पाहून माझ्या चटकन लक्षात आलं कि एखादा 'निसर्ग-मित्र' येथे येऊन गेला आहे. बाजूची काही पाने जी आडोशाला कारणीभूत ठरत होती ती तुटून पडली होती. जवळच बिस्कीटच्या पुड्याची आवरणं पडली होती. बाजूच्या रस्त्यावरून घरट्याच दर्शन अगदी सहजपणे होत होतं.

देव जाणे तो पक्षी तिथे परत येईल ही कि नाही?! त्या 'निसर्ग-मित्रा' चा घटकाभर विरंगुळा झाला असेल ही; पण त्या इवल्याशा पक्ष्याची महिन्यांची मेहनत वाया गेली. शिवाय घरट मोडल्यामुळे ती आता तिची अंडी उबवायला येणार नाही. पुन्हा अंडी घालायची म्हटली तर पुढच्या विणीच्या हंगामाची वाट पाहावी लागणार हे वेगळच! म्हणजे किती मोठे, तिहेरी नुकसान झाले हे पर्यावरणाचे!! वर नंतर हे असेच 'निसर्ग-मित्र' बोंभाटा करणार कि पक्ष्यांची संख्या घटते आहे.. हेच का आपले निसर्ग-प्रेम? काय अर्थ आहे अशा निसर्ग-प्रेमाला???

स्वत:ला सृष्टी-शास्त्रज्ञ म्हणवणारे, निसर्ग-वादी म्हणवणारेच जेव्हा असं काही करू लागतात तेव्हा वाटत कि सामान्य माणूस अशा 'निसर्ग-मित्रां' पेक्षा कितीतरी पटींनी बरा.. योग्यायोग्य जरी कळत नसलं तरी त्यांना इतक माहित असतं कि चिमणीच्या घरट्याला, अंड्यांना हात लावला तर ती ते घरट सोडून निघून जाते. निदान या समजुतीमुळे तरी सामान्य माणूस पक्ष्यांच्या घरट्याजवळ जात नाही...

पण हे समजण्यास जितके सोपे आहे तितकेच अंगीकारण्यास महाकठीण! निसर्गाला नुसता दिखावा करणाऱ्या सृष्टी-वादी पर्यावरण-तज्ञांची गरज नाहीये. निसर्गाला खरी गरज आहे ती त्यावर निरागस प्रेम करणाऱ्या निसर्ग-प्रेमींची! निसर्गाला आपलं मानणाऱ्यांची!!!